प्रभूच्या कवितेविषयी...
प्रभू राजगडकर हे आदिवासी मराठी साहित्यप्रवाहातील पहिल्या पिढीतले एक महत्त्वाचे कवी आहेत. प्रस्तुत कवितासंग्रहातील त्यांची कविता आपल्या समकालीन सामाजिक व राजकीय पर्यावरणातील बदलत्या घडामोडींचे आणि आदिवासी समूहाच्या अस्तित्वाला छेद देऊ पाहणाऱ्या विचार-मानसिकतेचे अंत:स्थ हेतू प्रकट करणारी व त्याविरोधात उलगुलानचे नवे भान देणारी कविता आहे.
ही कविता फॅसिस्ट प्रवृत्ती आणि मूलतत्त्ववादी विचारसरणीच्या विरोधात आहे. म्हणूनच या कवितेत सर्वप्रकारच्या अधोगामी वृत्तीची भलावण करणाऱ्या छद्म राजसत्तेच्या व व्यवस्थेच्या धुरिणांकडून ऊर्ध्वगामी तत्त्वविचारांचा केला जाणारा संकोच आणि जल, जंगल, जमीन या नैसर्गिक स्रोतांवर आपली पिढीजात अधिसत्ता असलेल्या आदिवासींच्या जगण्यातील कोंडी अनुभवणारा श्वास - ‘विचार’ आणि ‘जगणे’ - अशा द्विविध पातळ्यांवरील एकूणच संघर्षाशी निगडित आहे. हा संघर्ष आदिवासी समूहांच्या केवळच आर्थिक जगण्याशी संबंधित नसून तो त्यांच्या जगण्यातील भावजीवनाशी आणि सांस्कृतिक मूल्यजाणिवांशीही जुळलेला आहे.
याच अंगाने या कवितेत फॅसिस्ट प्रवृत्तीच्या धोरणांनी मानवी कल्याणाची विचारसरणी आणि आदिवासी समूहांचे जगणे या दोहोंच्या वाट्याला येणाऱ्या कोंडीतून उद्भवलेले गुदमरणे तीव्रपणे अधोरेखित झाले आहे. या अधोरेखनात समकालीन राजकारण, नवभांडवली वृत्ती, आदिवासी समूह आणि त्यांचे नैसर्गिक हक्क व त्यांचे भावजीवन यांच्यातील आंतरसंबंध व आंतरसंघर्षाच्या अनेकविध कडा आणि नवभांडवली अधिसत्तेचा राजसत्ताक व्यवस्थेसोबत अर्थव्यवहाराच्या पातळीवरील असलेला छुपा अजेंडा आहे. त्यातून नैसर्गिक अधिवासात आपले जीवन जगणाऱ्या आदिवासी समूहांच्या वाट्याला विकासाच्या नावावर येणारी घुसमट, त्यांचे उद्ध्वस्तीकरण व त्यांचे मरण... असा या कवितेचा संवेद्य परीघ आहे.
म्हणूनच आजच्या बदलत्या वातावरणात नवभांडवली राजसत्ता आणि कार्पोरेट जग यांच्या युतीचा अमानवी चेहरा लक्षात घेऊन त्यातून आकाराला आलेल्या दुष्ट धोरणांचे फलित म्हणून आदिवासी समूहांच्या वाट्याला येणारे विनाशाच्या समकालीन वास्तवाचे अनेक प्रस्तर नेमकेपणाने उलगडून दाखवणारी या संग्रहातील कविता आपल्या समकालीन आदिवासी मराठी कवितेतील एक महत्त्वाचे प्रकटन आहे.
- प्रो. डॉ. अशोक नामदेव पळवेकर