‘उठावाचे तप्त दिवस’ हा शशिकांत हिंगोणेकरांचा अठ्ठावीसावा कवितासंग्रह आहे. शिवाय नऊ कवितासंग्रह ‘आगामी’च्या रांगेत आहेत. म्हणजे कवितेचा नित्य रियाज करणारे हिंगोणेकर हे मराठी पटलावर स्थिर झालेले कवी आहेत. त्यांनी सातत्याने आणि निष्ठेने कविता लेखन केले आहे.
ह्या संग्रहात व्यवस्था विरोधातील विद्रोह अत्यंत संयतपणे पानोपानी उजागर झाला आहे. ही कविता वंचितांची आदिम वेदना धुंडाळताना दुःखाच्या मुळांचा शोध घेते. कवीचा कवितेशी घडणारा संवाद हे या रचनांचे विशेष आहे. एकांताला फुलपाखराचं लोभस रुप देऊन न्याहाळणे असो की दुःखाचा शेजारधर्म निभावणे असो, लीलया घडत गेल्यामुळे ठणकणाऱ्या दुःखाची कविता अवतरली आहे. तसा प्रत्येक कवी भोवतालाचं अपत्य असतो. जगण्यातील अभावग्रस्तता, शोषणाची जाणीव इथे शब्दाशब्दांतून ध्वनित होते. अंधारलेल्या भिंगुळवाण्या वाटेवर अत्त दीप भवचा मार्ग कवितेला एक अधिष्ठान प्राप्त करून देतो. ही अल्पाक्षरी कविता सहज स्वाभाविकपणे बोलताना संवादी होत जाते. हा उठाव तप्त असला तरी समंजस आणि परिपक्व आहे.
- दासू वैद्य