तो तिचा पती आहे, तसेच कोणाचा तरी मुलगा किंवा भाऊ आहे. त्याच्या रक्तसंबंधाचा एक गोतावळा आहे. त्याचा त्याविषयी लोभ आहे, पण त्याची जोडीदार तशी नाही. तिची ओढ व लोभ माहेराकडे असते. ही विसंगती त्यांच्यातील संघर्षाचे कारण ठरते, तेव्हा तो तिच्याशी कसा वागतो, हे त्याच्या भावना व विचारांसह कविता निर्माण होत गेली आहे.
‘तो’ मित्र आहे, तसा स्नेही व प्रियकरदेखील आहे आणि ‘ती’ मैत्रीण आहे, तशी प्रेयसीही आहे. दोघांच्या भावसंबंधात ‘तेच्या म्हणजे लोकांच्या परंपरागत मानसिकता, रूढ झालेली जुनाट मूल्ये, त्यातून तिचे घडलेले मन व तिचे दृष्टिकोन ‘त्याच्या’ स्वप्नांना बाधक ठरतात. धड बोलता येत नाही आणि सहनही करता येत नाही, अशी त्याची अवस्था होते. तिच्याशी असलेल्या ऋणानुबंधामुळे तो दुरावाही सहन करू शकत नाही. ही त्याच्या मनाची चाललेली तगमग काही कवितांमधून दिसून येईल. त्याचे केविलवाणे मनोभाव रसिकमनाला स्पर्श करून जातील. ह्या कविता पुरुषकेंद्री असल्याने ‘तोचे भावविश्व समजून घेता येईल.