चंद्रकांत भंडारी यांचा आरसा म्हणजे त्यांचा नायक - ‘सूर्यकान्त अमळनेरकर’! तोही त्यांच्यासारखाच अमळनेरचा. पेशाने शिक्षक. शिक्षकी वातावरणात, पुस्तकांच्या सान्निध्यात आणि साध्या जगण्यात जीवनाचं सुख शोधणारा. त्याला एक मुलगी आवडते. तो तिला तसं सांगतोही. त्यासाठी काही पत्रे लिहितो. त्याचा मित्र ती पत्रे तिच्यापर्यंत पोहोचवतो. मात्र, त्या वयाला शोभणारा राग, अवघडलेपण ‘तिला’ वाटतं. ती संपर्क कमी करते आणि इथे ‘सूर्यकान्त’च्या प्रेमाचा उगवता सूर्य मावळतो. आपल्यामुळे तिला त्रास झाला, तिचं मन दुखावलं या विचाराने तिच्यापेक्षा जास्त त्याचं मन दुखावतं आणि ती सल घेऊन तो महाविद्यालयातून बाहेर पडतो. परंतु, आपला हा अश्वत्थामा पुढे आयुष्यभर तिला शोधत ती ठसठसती जखम घेत तसाच फिरत राहतो. इतकंच नाही, तर आपल्या पत्नीला मोकळेपणाने सर्व सांगतो. ती देखील परिस्थिती समजून घेते त्याला साथ देते आणि त्याच्या शोधाला आडकाठीही घालत नाही. मोबाईल, सोशल मीडिया, व्हॉट्सॲप वगैरे नसलेल्या त्या काळात सुटलेली साथ. नाव सोडून कोणतीही माहिती जवळ नाही. अशा स्थितीत तो तिला कसं शोधतो? ती त्याला सापडते का? सापडली असेल तर तो तिला ‘तसदीबद्दल क्षमस्व!’ असं म्हणतो का? आणि ती त्याला क्षमा करते का? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी वाचण्याची प्रेमळ ‘तसदी’ घ्यायला हवीच!
- मयूर भावे, पुणे
(लेखक, वक्ते व पत्रकार)