‘शापित शृंखला’ या कवितासंग्रहात कवयित्री छाया बोरकर यांनी सामाजिक संवेदनांना अचूकपणे टिपणारी आणि उजागर करणारी अत्यंत तरल कविता शब्दबद्ध केली आहे. मानवी जीवन, मानवा-मानवातील संघर्ष, या संघर्षाचे सामाजिक अस्थिरतेत होणारे रूपांतर, त्यामुळे भंग पावणारी सामाजिक शांतता, सत्य, शिव व सुंदर यावरचा मानवाचा उडत चाललेला विश्वास, वाढलेली दांभिकता, बोकाळणारा प्रखर जातीवाद या सर्वामुळे मानवाची व पर्यायाने समाजाची अतोनात हानी होत असल्याचे चित्रण या कवितांमधून कवयित्रीने केले आहे. समाजात जे-जे म्हणून काही चांगले करता येईल त्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. लिंग, वर्ण, जात, धर्म यानुसार होणारा भेदाभेद टाळावा, प्रत्येकाला जगण्याचा समान हक्क मिळावा, सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, माणुसकी जपावी, सर्वांनी बंधुभावाने राहावे ही संविधानिक मूल्ये या कवितासंग्रहातील विविध कवितेमध्ये प्रतिबिंबित झालेली दिसतात. भारतीय संविधानाप्रती आदर, महामानवांच्या विचारांचा जागर, समाजहितास प्राधान्य, उपेक्षितांना आधार, लढणाऱ्याला बळ, दुष्ट प्रथांची पोलखोल, मानवी मूल्यांवर विश्वास, राष्ट्रप्रेमाची भावना, सामाजिक परिवर्तनासाठी घातलेली साद, स्त्रियांमध्ये जागृत केलेली स्वत्वाची जाणीव अशी बहुपदरी कविता कवयित्री छाया बोरकर लिहितात.
या कवितासंग्रहातील कविता वाचकांच्या मनाचा ठाव घेतील, या काव्यसंग्रहाचे रसिक व श्रोते उत्स्फूर्त स्वागत करतील अशी अशा आहे. कवयित्री छाया बोरकर यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील लेखनास शुभेच्छा देतो.
- डॉ. शिवाजी नारायणराव शिंदे
सहाय्यक कुलसचिव,
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
सोलापूर विद्यापीठ, सोलापूर