शशिकांत हिंगोणेकर काव्यक्षेत्रातील न टाळता येणारं नाव ! 20-25 कवितासंग्रहांच्या पसाऱ्यात छलचक्र आणि अंतःस्वर नंतरचा ‘सर्वत्र’ हा तिसरा हायकूसंग्रह आहे. दीर्घ कविता आणि हायकूसारखी अतिलघु कविता हे कवी अतिशय संवेदनशीलतेने आणि ओघवत्या शैलीत लिहितात. काटा टोचला की डोळ्यातून आसवथेंब आपोआप गळतो, तसा या हायकूकाराच्या हातून हायकू लिहून पूर्ण होतो ! हे हायकू कल्पनेने वा उपदेशात्मक लिहिलेले नाहीत, तर रोजच्या जगण्यातील वास्तव मांडणारे आहेत. हायकूचा वास्तवतेचा मुख्य गुण घेऊन हे हायकू आलेले आहेत. जीवनातले चिरंतन सत्य जे सर्वसमावेशक आहे, त्याची अनुभूति या हायकूंतून घेताना जीव व्याकूळतो. कुठे बुडाले / मनातले चांदणे / दहशतीने असो कि, गिधाड थवे / उचलून नेतात / स्वप्नांची प्रेते इतकी दाहक वास्तवता इवल्या हायकूतून भेटीला येणे कल्पनातीत आहे. पानभर कविता लिहून येणार नाही ती आशयाची गहनता मोजक्या 17 वर्णांत येते. हे हायकूकार आणि कवी मनोरंजनासाठी शब्दांची माळ जपत नाहीत, तर संयमितपणे काळजात खोल रुतणारे शब्दबाण घेऊन चक्रव्यूह भेदण्याचा यत्न करताना दिसतात. हायकूचा आत्मा म्हणजे भोवतालची सृष्टी. ही सृष्टीदेखील या हायकूंतून आगळावेगळा संदर्भ घेऊन येते. इथली पानं फुलं मनाला रिझवत नाहीत, तर तेही माणसाचं जिणं जगतात. कुठली गाणी / पक्षी गात आहेत / पाने गळती वा फुले गळाली / मातीही सुगंधली / थरथरली सर्वसामान्य माणसांचे जगणे सुगंधीत हवेतही कवी विसरत नाहीत. जगण्यातील दाहक वास्तव, हायकूचा बाज सांभाळून, मराठीत प्रथमतः शशिकांत हिंगोणेकर यांच्याच हायकूतून दिसून येते. दहशतीचा/ थरकाप उडतो / जीभ छाटतो किती गहन अर्थ सामावला आहे यात! इतके दाहकपण असूनही हायकूकार आशावादी आहेत. सरते रात्र / रोज नव्या दु:खाची / पहाट होते सारखी प्रेरक हाक गलितगात्र झालेल्या जीवाला देऊन जगण्याची उमेद जागवतात. खचितच, हा हायकू माणसांच्या जगण्याचा सारांश म्हणून हायकू क्षेत्रात वाखाणला जाईल.
- तुकाराम पुंडलिक खिल्लारे