सर्वकाल या शशिकांत हिंगोणेकर यांच्या कवितासंग्रहातील कविता आकाराने लहान असल्या तरी त्या आशयाने समृद्ध आहेत हे लगेच जाणवते. सर्वकाल हे वैशिष्ट्यपूर्ण शिर्षकही आतील कवितांचे विश्व गोचर करण्यास समर्थ आहे. कवीला कसलीही घाई नाही. तो म्हणतो शब्दांचे हे अंकुर हळुहळू वाढताहेत. क्षणात शब्दांचे झाड मोठे व्हावे याची कुठलीही घाई नाही मला. ज्या मातीत शब्द उगवलेत त्या मातीत ओल कशी राहील याचीच काळजी छळतेय मला ही कविता अल्पाक्षरी असली तरी वाचकास विचार करायला लावणारी आहे. कवी जीवनाबद्दल निराश नाही आहे. आपल्या कवितेच्या मातीत सातत्याने ओल कशी राहील ही जाणीव कवी जपत आहे.याचा अर्थ कवी जरी आंबेडकरी कवितेची मशाल घेऊन निघाला असला तरी तो इथे मात्र संयत भूमिका घेऊन जीवनाला कवटाळण्याचा प्रयत्न करताना दिसतो. या कवितासंग्रहातील एकूणच कवितेत ही संयत भूमिका कवीने घेतलेली दिसते. अर्थात कवी शशिकांत हिंगोणेकर यांचा विद्रोह नेहमीच संयत राहिलेला आहे. प्रश्न मांडण्यावर त्यांचा भर असतो. या कवितासंग्रहात तर कवी शशिकांत हिंगोणेकर हे इतर संग्रहांच्या तुलनेने अधिकच चिंतनशील झालेले दिसतात. हिंगोणेकरांची कविता बाह्यशक्ती पेक्षा अंतर्मनाशी संवाद साधण्यात अधिक रमतांना दिसते. त्यांना काळजातल्या तळघराची ओढ आहे. तिथेच त्यांना मनःशांती प्राप्त झाल्याचे जाणवते. हिंगोणेकरांची कविता कितीही संघर्षशील असली तरी त्यांच्या भाषेचा पोत कधीही बिघडताना दिसत नाही. तो नेहमीच संयमित राहिलेला आहे. हिंगोणेकर कवितालेखन विपुल प्रमाणात करीत असले तरी त्यांच्या काव्यात्म जाणीवा मात्र स्थीर राहिलेल्या आहेत.
- उत्तम कोळगावकर