भारतीय संविधानाचे निर्माण युगप्रवर्तक क्रांती आहे. हजारो वर्षांच्या इतिहासात भारतीय प्रजेला अपूर्व अशी संविधानात्मक मूल्यांची जीवन प्रणाली लाभली आहे. संविधानात्मक क्रांतीने भारताचे स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य प्रस्थापित झाले आहे. भारताचे विकार मुक्त, भयमुक्त राष्ट्र घडविले आहे. भारतात मानवतेचे युग अवतरले, भारतीय प्रजासत्ताक जगात आदर्श ठरले आहे त्याचे श्रेय स्वातंत्र्य संग्रामाप्रमाणेच मुलभूत सामाजिक परिवर्तनाच्या क्रांती लढ्यास देखील आहे. संविधानात्मक प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सव प्रसंगी सामाजिक क्रांती संग्रामाचा अभिमानाने, स्वाभिमानाने गौरव होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.