संतांनी आपल्या साहित्यातून समाजात सुख, शांती, ऐक्य, सहिष्णुता, मानवता, अध्यात्मिक लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. प्रेरणादायी व मार्गदर्शक तसेच नीती मूल्यांवर आधारित, शाश्वत मूल्यांवर आधारित साहित्याची निर्मिती संतांनी केली. मध्ययुगीन कालखंडात समाजातील विविध समस्यांचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने निर्माण झालेले संतांचे मूल्याधिष्ठित साहित्य सतत भव्यत्वाचा, दिव्यत्वाचा व अलौकिकतेचा शोध घेत आहे. आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगातही समाजाला आदर्श, मानवतावादी, समतावादी जीवन जगण्यासाठी संतांचे मूल्याधिष्ठित व सर्वसमावेशक साहित्य प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरणार आहे. साहजिकच आदर्श जीवनाची, स्वधर्माची, मानवतेची, आध्यात्मिक लोकशाहीची, सकारात्मकतेची रुजवण करण्यासाठी संत साहित्याचा सतत शोध घेणे महत्त्वाचे आहे. प्रस्तुत संत साहित्य आणि संशोधन या पुस्तकात संत साहित्य संशोधनाची पार्श्वभूमी, संत साहित्य संशोधनाचा हेतू, दिशा व व्याप्ती संत साहित्य संशोधनाची गरज व महत्त्व, विविध भक्ती संप्रदाय व संत साहित्य यांचा अनुबंध या विषयावर चर्चा केलेली आहे.