प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा असा एक सभोवताल असतो. त्यात अनेक घटना, वस्तू, व्यक्ती, पर्यावरण अशा अनेक घटकांचा समावेश असतो. श्री. शशिकांत हिंगोणेकर कवी कलावंत आहेत. सभोवताली घडणाऱ्या घटना परिस्थितिनुरुप होणारी परिवर्तने याकडे ते संवेदनशीलतेने पहातात. कवी हिंगोणेकर यांच्यासाठी कविता म्हणजे प्राण आहे. आजूबाजूची विषमता, झुंडशाही, राजकारण अशा वातावरणाने ते अस्वस्थ होतात. या त्यांच्या अस्वस्थतेपणालाही सांभाळणारी सखी कविताच होते. पण कधी असाही क्षण येतो अनुभूतीच्या अभिव्यक्तीची अनावर ओढ असूनही काही सुचत नाही, शब्द रुसून बसतात. अशा या जीवघेण्या खेळात त्यांच्या कवितेचा श्वास गुदमरतोय. कधी कधी तर आपला प्राण असलेली कविता आपल्याला सोडून जाते की काय याचे भय त्यांना वाटते. “कवितेशिवाय मी पडलो अंधाराच्या कालकोठडीत” ही भावना क्रमाने प्रबळ होत जाते आणि शेवटी “सारे श्वास, कवितेच्या हवाली करुन, मी मुक्त होऊन जाईल, या अवकाशातून” या शब्दांत कवी आपली हतबलता दर्शवतात. कवी मनाची तगमग, ती व्याकुळता शब्दांकित करताना अनुभवाचा सच्चेपणा व झाड, रिंगण, वाळवी अशा तरल भावस्पश प्रतिमा यामुळे कवी मनाने टिपलेला हा सभोवताल मनावर ठसतो.
- प्रा. डॉ. सुनीता सांगोले
अधिष्ठाता,
मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर,
अमरावती