साठोत्तरी मराठी साहित्यात आपल्या अनुभवविश्वाने आणि लेखनशैलीने प्रस्थापित झालेले काही महत्त्वाचे लेखक आहेत, त्यात प्राचार्य रा. रं. बोराडे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. रा. रं. बोराडे यांचे नाव घेताच, नजरेसमोर येते ती त्यांची ‘पाचोळा’ ही कादंबरी. ग्रामीण जीवनातील मूल्यांतरांच्या संदर्भात या कादंबरीचे महत्त्व विशेष आहे. तथापि, आपल्या लेखनाच्या रूढ चौकटी मोडून, नव्याचा शोध घेणारे लेखक म्हणून बोराडे यांच्या लेखनाचा विचार करावा लागतो. नवे अनुभवविश्व, नवी क्षेत्रे खुणावत असताना, त्याकडे आस्थेने पाहण्याचे कसब बोराडे यांच्यात होते. म्हणूनच त्यांनी राजकीय विषयांवरील महत्त्वाच्या कादंबऱ्यांची निर्मिती केली आहे. ‘आमदार सौभाग्यवती’, ‘मरणदारी’ आणि ‘नामदार श्रीमती’ या त्यांच्या तीन कादंबऱ्या राजकीय म्हणून गणल्या जातात. बोराडे यांच्या या तीन कादंबऱ्यांचा विचार करता, राजकारणात स्त्रीची होणारी कुचंबणा, त्या व्यवस्थेत तिच्या पदरी पडणारे यश-अपयश आणि त्यातून उभी राहणारी, खचणारी ती स्त्री- असा अनुभवाचा पोत जाणवतो. मुळातच रा. रं. बोराडे यांचे लेखन स्त्रीभावविश्वाशी अधिक घट्ट नाते सांगणारे असे आहे, आणि त्याची प्रचीती याही लेखनातून येते.
मराठीतील राजकीय कादंबरी लेखनाचे विश्व तसेही सीमित आहे. फार कमी लेखकांनी मोजक्या राजकीय कादंबऱ्या लिहिल्या आहेत. राजकीय लेखनासाठी समकालीन राजकारणाची नाळ ओळखणारी दृष्टी त्या कादंबरीकाराजवळ असावी लागते. समकालीन राजकारण आणि माणूस यांतील भावबंध अधिक तन्मयतेने शोधणारी व्यापक, मातृहृदयी दृष्टी असणे आवश्यक ठरते, आणि ती रा. रं. बोराडे यांच्याकडे होती. त्या दृष्टीचा मराठी जाणकारांना, अभ्यासकांना सर्वार्थाने शोध घेता येईल असे मर्मग्राही विवेचन डॉ. भास्कर पाटील यांनी या ग्रंथात केले आहे. त्यामुळे या लेखनाचे मोल अधिक आहे. त्यासाठी डॉ. भास्कर पाटील अभिनंदनास पात्र ठरतात, आणि समीक्षक म्हणूनही त्यांच्या लेखनाचे अचूक मर्म सुद्धा कळून येते.
- डॉ. रवींद्र शोभणे
अध्यक्ष, 97 वे अ.भा.मराठी साहित्य संमेलन, अमळनेर
तथा अध्यक्ष, विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य