'पाऊस शाळा', 'आभाळाची सावली' बालकविता संग्रह आणि 'भटकन' कादंबरी यानंतर कवी रविंद्र सोनवणे हे आपला चौथा कवितासंग्रह 'पाटी अन् ढगफुटी' घेऊन रसिकांच्या भेटीला येत आहेत.
रविंद्र सोनवणे हे उत्तम शिक्षक असलेले सामाजिक चळवळीची जाणीव असणारे कार्यकर्ते कवी, लेखक आहेत. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी सातत्याने प्रयोगशील असतात.
सभोवतालच्या समाज जीवनात घटनांचे निरक्षण, अभ्यास आणि निष्कर्ष काढण्याची चिकित्सक दृष्टी या कवितासंग्रहातून कवी रविंद्र सोनवणे यांच्याकडे दिसून येते. समकालीन वास्तवाचा उभा-आडवा छेद घेत ही कविता वाचकाला नवीन प्रश्नांकडे गंभीरपणे पाहायला लावते. हेच या कलेचे लक्षणीय यश आहे; असे मला वाटते.
कवी रविंद्र सोनवणे यांची नवीन, सर्जनशीलतेला आयाम देणारी ही कविता निश्चितपणे वाचकांना मर्मदृष्टी देईल. त्यांची भाषाशैली साधी व परिणामकारक असूनही काही ठिकाणी तर खूपच प्रसादपूर्ण वाटते. समाजाच्या भल्यासाठी कवी रविंद्र सोनवणे यांनी यापुढेही लिहित राहावे; ही मंगल कामना !
विलास सिंदगीकर
माजी सदस्य-महाराष्ट्र राज्य साहित्य आणि
संस्कृती मंडळ, मुंबई.
संवादः ९४२१३६९९४५