“आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इस में, जिंदगी बिता दो, पल जो ये जाने वाला है’! जीवनातील विविध क्षणांना त्यांचे त्यांचे म्हणून ‘रंग’ असतात व कवी-लेखक ‘त्या’ क्षणांना जे जे रंग भरतात ते खरंच अनुभवण्यासारखे असतात. असो. असेच काही क्षण लेखक सुनील मायी यांनी ‘निनावी’ संग्रहात खास ‘मिश्किल’ टच देत टिपले आहेत. कॉलेज जीवनात औरंगाबाद (आताचे संभाजीनगर) शहरात ‘जिंदगी ये लमहा जी लेने दे’ म्हणत आपल्या मित्रांसमवेत मायी यांनी जे ‘कारं’ जीवन अनुभवलं ते खरंच छानसं उतरलं आहे. ‘पुन्हा जन्म जर मिळाला तर शिक्षणासाठी ‘औरंगाबाद’ व हेच ‘विद्यापीठ’ मिळो ही प्रार्थना मी करतो,’ असं म्हणणाऱ्या मायींच्या मनात वा हृदयात ‘ते’ दिवस (अजूनही) किती घट्ट रुतून बसले आहेत, हे त्यांच्या अकरा लेखांद्वारे पदोपदी जाणवतं. म्हटलं तर या अकरा लेखांचं स्वरूप जरी ‘व्यक्तिचित्रे’ या सदरात मोडत असलं तरी त्यात औरंगाबादच्या विविध गल्ल्या (मोहल्ले), सिनेमाटॉकीज, चहा/पान टपऱ्या, खानावळी तसेच विद्यापीठ परिसर यांची जी ‘सफर’ मायी घडवतात ती मुळापासून वाचावी अशी आहे. ‘दिल ढूँढता है फिर वही फुर्सत के रात-दिन’ या ओळीचा आधार घेत सांगायचं तर हा ‘आठवणींचा कोलाज’ जरी ‘ऱ्हस्व’ असला तरी ‘दीर्घ’ स्मरणात राहणारा आहे. असो, ‘मी आणि माझी औरंगाबादची संस्कृती - माझ्यापुरती’ असं जरी सुनील मायी म्हणत असले तरी ती ‘विविधरंगी’ संस्कृती ‘छोटी बातें, छोटी-छोटी बातों की हैं यादें बड़ी’ अशीच आहे.
- चंद्रकांत भंडारी, जळगाव
(लेखक, समीक्षक)