व्यावहारिक यशाची गुरुकिल्ली
आजच्या गतिमान आणि स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक ज्ञान असून चालत नाही, तर त्या ज्ञानाचा व्यवहारात अचूक आणि प्रभावी उपयोग करता येणं हे अधिक महत्त्वाचं ठरतं. याच पार्श्वभूमीवर प्रा. डॉ. संदीप कडू माळी यांच्या लेखणीतून साकारलेलं ‘व्यावहारिक कौशल्य’ हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक आहे.
या पुस्तकात माध्यम म्हणजे काय?, मुद्रित माध्यमे (वर्तमानपत्र), श्राव्य माध्यमे (आकाशवाणी), मुलाखत तंत्र, ग्रंथ परीक्षण यांसारख्या व्यवहारातील कौशल्यांचे सखोल आणि व्यावसायिक पद्धतीने विवेचन करण्यात आले आहे. लेखन, निवेदन, संवाद कौशल्ये, विश्लेषणात्मक दृष्टिकोन, भाषेची अचूकता आणि अभिव्यक्तीचा प्रगल्भतेकडे होणारा प्रवास, हे सर्व पैलू लेखकाने अत्यंत सुसंगत आणि सरळ भाषेत मांडले आहेत.
प्रा. डॉ. माळी यांचे शिक्षण व संशोधन क्षेत्रातील तसेच आकाशवाणी पुणे केंद्रावरील प्रत्यक्ष कामकाजाचा दीर्घ अनुभव, त्यांची भाषाविषयक समज, तसेच विद्यार्थ्यांच्या गरजांची अचूक जाण या साऱ्या गोष्टी पुस्तकाच्या प्रत्येक पानावर जाणवतात. ‘शिकवण्याइतकंच, शिकण्यालाही मार्गदर्शन लागतं’ हे जाणून त्यांनी हे लेखन केवळ शैक्षणिक न राहता, व्यवहारात उतरण्याजोगं केलं आहे.
विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, अभ्यासक तसेच इतर क्षेत्रातील व्यावसायिक यांना हे पुस्तक स्वत:च्या व्यावहारिक कौशल्यांची धार अधिक तीव्र करण्यासाठी एक विश्वासार्ह साधन ठरेल, यात शंका नाही.
व्यावहारिक यशाच्या वाटेवर चालताना हा मार्गदर्शक ग्रंथ नक्कीच नवी कौशल्य पेरणारा ठरेल!
- प्रोफेसर वासुदेव वले,
सदस्य, मराठी अभ्यास मंडळ,
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.
उपप्राचार्य, श्री शेठ मु. मा. महाविद्यालय, पाचोरा.