जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू होऊन आता तीन-चार दशके होत आली आहेत. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे जागतिकीकरणाची अपरिहार्यता आपण टाळू शकलेलो नाही हे कटू असले तरी खरे वास्तव आहे. जागतिकीकरणाचे इष्ट-अनिष्ट दूरगामी परिणाम आपल्या अर्थकारणावर, समाजकारणावर, भाषेवर, संस्कृतीवर विशेष म्हणजे ग्रामीण जीवनावर झालेला आहे. त्यामुळे कधी नव्हे ती ग्रामीण संस्कृती वेगवेगळ्या अंगाने प्रभावित झाली आहे.हा झालेला बदल कलेतून आणि साहित्यातून मांडण्याचा प्रभावी प्रयत्न दोन दशकांपासून सुरू झालेला आपणास दिसतो.
‘खांदेमळणी’ हा कथासंग्रह त्याचे प्रातिनिधिक उदाहरण होय. ग्रामीण जीवनात झालेल्या सामाजिक, राजकीय, सांकृतिक किंवा भाषिक बदलाची सूक्ष्म दखल हा कथासंग्रह घेताना आपणास दिसतो. ‘खांदेमळणी’ या कथासंग्रहात लेखक कोणतेही भडक भाष्य किंवा विधान करीत नाही किंवा ग्रामजीवनाचे फार तपशील मांडत नाही तर ग्रामीण जीवनातील सर्व पातळ्यांवरील सूक्ष्म वस्तुनिष्ठता टिपते. व्यक्तिरेखेतील विविधता, नात्यातील ताणतणाव, सामाजिक-राजकीय जीवनातील पेच, त्यातील अंतर्गत संघर्ष, जीवनाचे विविधांगी बदलते स्वरूप अस्सल भाषेतून मांडणे हे अनंता सूर यांना लिलया जमले आहे. ग्रामीण कथेचा जो एकूणच परीघ आहे तो या कथासंग्रहामुळे नक्कीच विस्तारल्या जाणार आहे. अनंता सूर यांच्या भविष्यातील कथा अधिक प्रगल्भ आणि परिणत होऊन येईल याची आश्वासक खात्री ‘खांदेमळणी’ हा कथासंग्रह आजच आपणास देतो.
- प्रमोदकुमार अणेराव
ज्येष्ठ साहित्यिक आणि चित्रकार