कविता ही प्रत्येकाच्या मनात असतेच. ती जेव्हा आतून अस्वस्थपणे बाहेर येते, तेव्हा ती संजीवक कविता म्हणून जन्म घेत असते. कवी शंकर रंगनाथ भामेरे हे कवितेच्या प्रांतात त्यांची सत्वशील कविता घेऊन उतरले आहेत. त्यांच्या निर्मळ आणि चारित्र्यशील व्यक्तिमत्त्वाची चाहूल त्यांच्या कवितेत सतत मनाला स्पर्श करणारी आहे. ज्ञानदानाच्या पवित्र विद्यालयात ते कार्यरत आहेत. म्हणूनच त्यांच्या कवितेत संस्काराची बीजं पेरणाऱ्या कविता संग्रहभर आहेत. अत्यंत तरल, नितळ मनातून आलेली ही कविता स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा स्वीकार तर करतेच, त्या मूल्यांचा जागरही मांडते हे त्यांच्या कवितेचे बलस्थान आहे. सभोवताली सर्वच क्षेत्रात प्रदूषण पसरले आहे; त्यामुळे ते जरी अस्वस्थ असले तरी ते आशावादी आहेत. हे जग मानवतावादी होईल, यावर त्यांचा दृढ विश्वास आहे. तो लाखमोलाचा आहे, चिंतनशील आहे. मानवतेचा वसा घेणाऱ्या या कवितेला माझ्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!
- शशिकांत हिंगोणेकर