अतिशय वेगळ्या वळणाची, कृषिजन परंपरेच्या तळातील माणसांची भाषा बोलणारी, त्यांच्या हक्काची मागणी करणारी सुनील तोरणे यांची कविता आहे. झोपडीचं पोट खुरप्याने शिवणारी आई, मी उद्याचं पुस्तक होईन, मजुरीचा मूठभर उजेड, तोडकऱ्यांच्या पदराला बांधलेली सांजवेळ, गावाचा मोहेंजोदडो, तहानभूक स्वातंत्र्यगीत गाणार नाही अश्या वेगळ्या प्रतिमांमधून बोलणारी ही कविता फुलांचा आदिम दरवळ वाचकांच्या मनात निर्माण करते. मराठी भाषा, परंपरेचे पूर्ण भान ठेवून कवी स्वतःला संतांशी जोडून घेत वर्तमानातल्या कष्टकऱ्यांच्या हक्कदारीची मागणी या कवितेतून करताना दिसतो, तेव्हा गद्य लयीतून येणारी ही कविता एखाद्या पोवाड्यासारखी वाटून जाते.
भुकेला असणाऱ्या भुकेची भाषा या कवितेला कळते. राबणारे आईवडील आणि ऊसतोड करणारे तोडकरी यांचे काळ्या मातीचे आणि शेतशिवाराचे जग हेच कवीचे भावविश्व आहे. या विश्वाच्या हुंकारातून आकाराला आलेली ही कविता उशाला बांधून ठेवलेल्या नितळ मानवी स्वप्नांबद्दल बोलत जाते. या बोलण्यात असणारी सहजता या कवितेला एक प्रकारचा नैसर्गिक भाव प्रदान करते. कवीच्या कवितेच्या जगातील बाया-माणसे खेड्यातील अधोविश्वातील माणसे आहेत. मजुरीच्या मूठभर उजेडात आयुष्य कंठणारी माणसे आहेत. त्यांच्या दुःखाची लय तोरणे दूरस्थ म्हणून आत्मसात करीत नाहीत, तर आपल्याच संवेदनविश्वाचा एक भाग म्हणून कविता होऊन व्यक्त होतात, त्यामुळे ही कविता जैविकदृष्टीने अधिकच एकजीव होऊन बोलताना दिसते.
कष्टकरी विद्रोहाचे एक रचनात्मक रुप म्हणून देखील या कवितेकडे पहाता येईल. परंपरेकडून आधुनिकतेकडे जाताना वाढणारे शोषणाचे स्थायित्व कवीला अस्वस्थ करून जाते. त्यामुळे परंपरेला परंपरा म्हणून कुरवाळत बसण्याचा या कवितेचा स्वभाव नाही. रंजकता आणि आभासी जगणे तिला आपले वाटत नाही. पोटाला चिकटलेल्या भुकेची भाषा बोलताना थोड्या दीर्घ स्वरात ही कविता बोलत जाते तेव्हा श्रमिकांच्या वेदनेचे एक जग समोर घेऊन येते.
जात्याचे भरून आलेले डोळे जसे या कवितेतून दिसतात आणि फडातून घाम गाळत फिरणारा श्रमिकांचा हातही दिसतो. कष्टकऱ्यांच्या जगण्याच्या समग्रतेला कवेत घेऊ पाहणारी ही कविता समकालीन कवितेत स्वतःची पायवाट निर्माण करणारी आहे.
- श्रीकांत देशमुख, नांदेड