भौगोलिक घटकांचा मानवी जीवनावर, जनजीवनावर तसेच संरक्षण आणि युद्धाच्या पद्धतींवर प्रचंड प्रभाव पडतो. पर्यावरण, भूगोल आणि राजकारण यांचा परस्पर संबंध सुरक्षा धोरण निश्चित करतो. म्हणूनच भूराजनीती व भूसमरनीतीचा अभ्यास आज अत्यावश्यक ठरतो. या पुस्तकात भूसमरनीतीचा उगम, विकास आणि आजच्या आंतरराष्ट्रीय संदर्भातील उपयुक्तता यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. प्राचीन काळापासून अरिस्टॉटल, रॅटझेल, क्लाऊत्झेविज, ॲडमिरल महान, मेकिन्डर यांसारख्या विचारवंतांनी मांडलेल्या संकल्पनांचा आढावा घेतला असून पहिल्या महायुद्धानंतर भूसमरनीती कशी स्वतंत्र शास्त्र म्हणून विकसित झाली हे स्पष्ट केले आहे. जमिनीचा भूगोल युद्धाची दिशा व रणनिती निश्चित करतो, या गृहितकावर आधारित भूसमरनीतीचे विविध पैलू उलगडले आहेत. रणनिती, डावपेच आणि महासमरनीतीची तत्त्वे, त्यांचा ऐतिहासिक संदर्भ आणि आधुनिक काळातील महत्त्व यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
भूसामरिक खनिजसंपत्ती राष्ट्राच्या आर्थिक विकासात व लष्करी तयारीत किती मोलाची भूमिका बजावते, याचे सविस्तर विश्लेषण येथे केलेले आहे. त्याचप्रमाणे पश्चिम आशियाचे भूसामरिक महत्त्व, भारतातील अंदमान-निकोबार, लक्षद्वीप आणि जम्मू-काश्मीर यांचे सुरक्षेसाठी असलेले योगदान तसेच अफगाणिस्तानाचे भूराजकीय महत्त्व या संदर्भात सखोल विवेचन केले आहे. भूसमरनीती हा विषय बहुपैलू व आंतरविद्याशाखीय आहे. भूगोल, राजकारण, अर्थशास्त्र, पर्यावरण या सर्व विषयांचा संगम यात दिसतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना, संशोधकांना, स्पर्धा परीक्षार्थींना तसेच आंतरराष्ट्रीय राजकारण वा संरक्षणशास्त्राची आवड असलेल्या सर्व वाचकांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.