'भटकन' या कादंबरीमध्ये लेखक रविंद्र भास्कर सोनवणे यांनी आपले अनुभव, संघर्ष आणि ग्रामीण जीवनातील भावनिक पैलूंना हृदयस्पर्शी शब्दांत गुंफले आहे. ही कादंबरी म्हणजे ग्रामीण संस्कृतीचा आरसा असून, कष्टकऱ्यांच्या वेदनांना शब्दरूप देणारा प्रामाणिक प्रयत्न आहे. लेखकाच्या भटकंतीतील संघर्ष, पाण्यासाठीचा आटापिटा, कुटुंबातील त्रासदायक घटना, आणि शिक्षणासाठी झगडताना आलेल्या अडचणी यांचे भावपूर्ण चित्रण वाचकांना अंतर्मुख करते.
चांभारवाड्याच्या दुर्गंधीत काम करणाऱ्या हातांना स्वाभिमानाचे बळ देत लेखकाने उभे केलेले जीवन प्रेरणादायी आहे. पुस्तकाच्या पानांमध्ये विविध भाषांची आणि लोकजीवनाची छटा आढळते. पिढीजात व्यवसायातील तडजोडी, सामाजिक अवहेलना आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे ओझे सांभाळत लेखकाने आपले स्वप्न साकारले आहे.
ही कादंबरी संघर्षाची गाथा असून, वाचकांच्या मनाला स्पर्श करून जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देते. ग्रामीण जीवन, त्यातील भाषा, भाव-भावना आणि निसर्गाची सजीवता वाचकांना मंत्रमुग्ध करते. ही कादंबरी आपल्यालाही जीवनाचा अर्थ शोधायला भाग पाडेल.
- देवा झिंजाड