कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची कविता ही त्यांच्या जगण्याची लय, ताल, नाद, स्वर मुखर करणारी आहे. शंभर वर्षांपूवच्या कृषिजनसंस्कृतीशी समरस झालेल्या एका शेतकरी स्त्रीजीवनाचे हे ह्रदगत आहे. कष्टकरी माणसांच्या जीवनधर्माचे मर्म काव्यात्मतेने व्यक्त करणारी ही रचना जगण्याच्या तत्त्वज्ञानाची सहजपणे ओळख करून देणारी आहे. डॉ. उज्वला पंकज नन्नवरे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचे आकलन करून घेताना एक स्त्री म्हणून स्वतःच्या जगण्याचाच एकप्रकारे शोध घेतला आहे. निसर्ग, अध्यात्म, जीवनविषयक तत्त्वज्ञान या सूत्रांच्या अनुरोधाने या कवयित्रीच्या कवितेचे अनोखेपण धुंडाळण्यासाठी अभ्यासकाने हा खटाटोप केला आहे. बहिणाईंची कविता ही किती अर्थ आवाहक आणि अर्थ प्रसरणशील आहे याचा प्रत्यय या मांडणीतून येतो. त्याबद्दल डॉ. उज्वला पंकज नन्नवरे यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुस्तकाचे मनःपूर्वक स्वागत.
- प्रा. आशुतोष पाटील