आंतर्विरोधी भोवतालावर, समाजव्यवहारावर आत्यंतिक संवेदनशीलतेने भाष्य करणारे कवी म्हणून शशिकांत हिंगोणेकर यांची ओळख आहे. अत्यंत साध्या, सोप्या शब्दकळेतून भावगर्भ आशय प्रकट करणारी त्यांची कविता अस्वस्थ वर्तमानाच्या असंख्य ज्ञात- अज्ञात बाजूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न करते. युद्ध आणि तत्सम समाजसंहारी वास्तवाला प्रतिमित करताना ते धर्म आणि राजकारणाचा अमानवी चेहराही अधोरेखित करतात. माणसाच्या सार्वभौम अस्तित्वाला तडा देणाऱ्या अंत:कलहाला, अराजकाला ही कविता सामोरी जाते. माणसांविषयीची खोल आस्था या कवितेत एकवटली आहे. माणसाच्या प्रयोजनशून्य जगण्याचा तळठाव घेतानाच भाव-भावनांच्या कोवळ्या ऋतूनांही ही कविता प्रतिसाद देते. ही कविता अल्पाक्षरी असली तरी प्रत्येक शब्दांना कवीने आशयाचे व्यापक परिमाण दिले आहे. सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक अनुभवांसकट ही कविता मानवी मनाच्या निर्लेप आंतरक्रियेलाही कवेत घेते आणि समतायुक्त निरामय जगण्याचे मनोज्ञ स्वप्न पाहते. ‘अर्थाक्षरी’ हा संग्रह म्हणजे कवीच्या व्यापक अशा आत्मचिंतनाचा, जीवनदृष्टीचा नितांतसुंदर आविष्कार आहे. या आविष्काराच्या मुळाशी सामाजिकता तर आहेच ; सोबतच मूल्यात्मक जाणिवेचे, सद्भावनेचे अनेक पदर आहेत. महत्त्वाचे म्हणजे सांस्कृतिक स्वातंत्र्याविषयीचे आणि स्वाभिमानी जगण्याविषयीचे ठोस विधानदेखील आहे.
- पी. विठ्ठल