“आत्मचिंतन, उदासीनतेची छाया व पडझडीतूनही डोकावणारा आशावाद यातून शशिकांत हिंगोणेकर यांची कविता आकार घेते. आपण आणि आपली कविता यात गुंतून पडलेली मानसिकता या कवितासंग्रहात जागोजागी प्रत्ययाला येते. आयुष्याच्या उतरत्या टप्प्यावरून घेतलेला स्वतःचा शोध आणि भल्याबुऱ्या अनुभवांची नितळ मांडणी करण्याकडे त्यांचा कल आहे. कुठलीच इच्छा, आकांक्षा मनात नसल्याची तीव्र जाणीव झाल्यानंतरचे उद्गार या कवितेतून प्रतिबिंबित होत जातात. अंतर्भेदी दीर्घ मौनातून उमललेल्या शशिकांत हिंगोणेकर यांच्या कवितेतून अंतिम सत्याच्या शोधात निघालेल्या कवीची व्यथा, आयुष्यभराची वैचारिक पुंजी आणि जपलेल्या सत्त्वाची मांडणी निनादत राहते. कवीची निरपेक्ष वृत्ती आणि त्याने केलेला चिंतनगर्भ भावाविष्कार ही या कवितेची जमेची बाजू आहे. इतरांसाठी सावली बनण्याची शशिकांत हिंगोणेकर यांची प्रामाणिक भावना ही या कवितेची खरी ताकद आहे. त्यातून झालेली कवीच्या नितळ मनाची अभिव्यक्ती या कवितेला अधिक प्रभावी बनवते, यात संदेह नाही.”
- सतीश बडवे