या पुस्तकात आधुनिक भारताच्या लोकशाही विचारांची पायाभरणी करणाऱ्या प्रमुख राजकीय विचारवंतांचे अध्ययन करण्यात आले आहे. लोकशाही राज्यव्यवस्थेच्या विचारांची पेरणी या विचारवंतांनी केली असून भारतीय लोकशाही नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायाची हमी देते. या पार्श्वभूमीचे सुलभ आकलन व्हावे म्हणून हे पुस्तक तयार केले आहे. आधुनिक भारताच्या निर्मितीत महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा वाटा आहे. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले, तर डॉ. आंबेडकरांनी राज्यघटनेद्वारे आधुनिक राजकीय व्यवस्थेची रचना केली. संविधान निर्मितीत डॉ. आंबेडकरांचे योगदान अनमोल आहे आणि म्हणूनच या पुस्तकात महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्या राजकीय विचारांवर विशेष प्रकाश टाकला आहे. गांधींच्या सत्य, अहिंसा, सत्याग्रह, सर्वोदय व हिंद स्वराज्य यांसारख्या संकल्पना स्पष्ट करण्यात आल्या आहेत. त्यांचा जीवनपरिचय, प्रभाव आणि पंचसूत्री यांचा उलगडा केला आहे. त्याचबरोबर डॉ. आंबेडकरांचा जीवन प्रवास, त्यांच्यावर पडलेले प्रभाव व प्रमुख विचार मांडले आहेत. अस्पृश्यता, संविधानवाद, सामाजिक न्याय, आरक्षण, महिला स्वातंत्र्य व हिंदू कोड बिल यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. गांधींचे राष्ट्रवाद, धर्म-राजकारण, आरोग्य, स्वच्छता व वंचितांसाठीचे विचार विशद केले आहेत, तर डॉ. आंबेडकरांचे उदारमतवाद, राष्ट्रवाद, राज्य समाजवाद, धर्मनिरपेक्षता व बौद्ध धर्मावरील विचार समजावले आहेत. सहज-सोप्या भाषेत लिहिलेले हे पुस्तक विद्यार्थी, अभ्यासक व वाचकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.