विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक, संवेदनशील कवी रविंद्र सोनवणे आपल्या 'पाऊस शाळा' या पहिल्या बालकवितासंग्रहानंतर 'आभाळाची सावली' हा नवीन बालकवितासंग्रह घेऊन मुलांच्या भेटीला आले आहेत. ही भेट नक्कीच मुलांना कवितेचा लळा लावणारी आणि त्यांचा आनंदाचा मळा फुलवणारी आहे.
सोनवणे यांची कविता मुलांना भरारी घेण्यासाठी कधी कवितेचे आभाळ देते. तर कधी उन्हात सावली होण्यासाठी गुलमोहराचे झाड होते. त्यांची कविता ससा कासवाच्या गोष्टीतले निरागसपण जपत मुलांच्या कल्पनाशक्तीला साद घालते. हे करत असताना कवितेतील लय, ताल, नादही जपत जाते. कवी सोनवणे यांना सुरांचे भान असल्यामुळे त्यांच्या कवितांचे आपसूक गाणे होते आणि हे गाणे मुलांना ठेका धरायला सहजगत्या लावते.
पंख असते तर, किती छान झाले असते उंच उडून जग सारे, पाहून आले असते.
अशी सहजता त्यांच्या कवितेत जागोजागी भेटते. त्यांची कविता मुलांना सोबत घेऊन निसर्गाच्या कुशीत शिरते.
थोडे दूर गेलो, पर्वतं ढगात भिडलेले
ढगही पर्वतांच्या, मिठीत सामावलेले
निसर्गदृश्य शब्दांत रेखाटताना त्यांची कविता अशी बोलकी होते. एकूणच कवी रविंद्र सोनवणे यांच्या 'आभाळाची सावली' या पुस्तकातील कविता सुंदर चित्रांच्या साथीने मुलांना कधी शेतशिवाराला फेरफटका मारायला नेते. कधी आनंदाच्या झुल्यावर बसून उंच आभाळी घेऊन जाते आणि म्हणूनच त्यांची कविता मुलांच्या आवडीची होते.
त्यांच्या पुढील काव्यप्रवासासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.
एकनाथ आव्हाड
(साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त कवी)