श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील माझे सहयोगी प्रा. संतोष देठे यांचा ‘तुला लढायचे आहे’ हा काव्यसंग्रह मराठी साहित्यविश्वात नव्याने येत आहे. याचा आम्हा सर्वांना आनंद होत आहे. या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील समकालीन ज्वलंत प्रश्नांना साकारले आहे. सामान्य माणसाच्या मनातील भावनांना ऊजाळा देत रोखठोकपणे अभिव्यक्त झालेली त्यांची कविता अतिशय साधेपणाने समोर येते आणि भविष्यातील प्रश्नांना उजागर करते. समकालीन वास्तवात परिवर्तनाचा विचार रूजविणारी त्यांची कविता रडणारी नसून लढणारी आहे. कुसुमाग्रजांची ओळ इथे मला आठवते ‘पैसे नकोत सर मला, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा!’ जीवनाचा संघर्ष ज्याचा त्यालाच लढायचा असतो. धीर देणारा हात मात्र हवा! तुकारामाचा वारसा सांगणारा हा कवी डाव्या विचारसरणीला पुढे नेणारा आहे. समाजवास्तवाचा वेध घेणारी त्याची कविता वरपांगी साधी, सोपी वाटत असली तरी मानवी मनातील प्रश्नांना जागवणारी संवेदनशील कविता आहे. सामाजिक मूल्यांचे भान ठेवून समतावादाचा अंगीकार करणारी आहे. प्रा. संतोष देठे यांची काव्यलेखनाची वाटचाल अशीच पुढे सुरु राहावी हीच सदिच्छा व पुढील लेखनकार्यास मनःपूर्वक शुभेच्छा!
- डॉ. सुधा मालधुरे
मराठी विभागप्रमुख (सेवानिवृत्त),
श्री शिवाजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजुरा.
जि. चंद्रपूर/हल्ली मु.पो.वऱ्हा, जि. अमरावती