मराठी भाषेचा उगम काळ सातव्या शतकापर्यंत पोहोचताना दिसतो. महाराट्री प्राकृत ही भाषा भारतामधील एक महत्त्वाची भाषा मानली जाते. कविता, नाटके आणि ललित लेखनासाठी महाराष्ट्री प्राकृत भाषेचाच उपयोग झालेला दिसतो. महाराष्ट्रामधील मानवी वसाहतीचा विचार मराठी भाषेच्या अनुषंगाने करता येतो, मराठी समाज, मराठी संस्कृती या सर्वांचा समग्रपणाने विचार महाराष्ट्र वसाहत संस्कृतीमध्ये होतो.
महाराष्ट्रात नाग लोक हे मूळचे रहिवाशी असले पाहिजेत. नागपूर, नागठाणे या ठिकाणांच्या नावांवरून नाग लोकांच्या प्रारंभापासूनच्या वसाहतींचा निर्देश होतो. त्याचप्रमाणे नागदेव, नागेश आणि नागांचा या प्रारंभीच्या व्यक्तीनावावरून देखील नागलोकांच्या प्रारंभीचा संदर्भ आढळतो.
महाराष्ट्रामध्ये विदर्भ, कोकण, मराठवाडा, खानदेश असा भौगोलिक फरक असणारा वेगळेपणा जाणवतो. सातवाहन काळापासून महाराष्ट्राचा इतिहास ज्ञात होताना दिसतो, प्रख्यात चिनी प्रवासी ‘ह्युएनत्संग’ याने महाराष्ट्र आणि मराठी माणसाविषयी इ.स. 7 व्या शतकात मत व्यक्त केलेले आहे. बौद्ध धम्माच्या अभ्यासासाठी आलेल्या या चिनी प्रवाशाच्या समांतर कालखंडामध्ये ’कुवलयमाला या ग्रंथामध्ये उदद्योतनसुरी याने मराठी माणसाविषयीचे वर्णन केलेले आढळते.