शिक्षकाची भूमिका ही समाजनिरीक्षकाची असते. समोर असणाऱ्या समाजाच्या विविध स्तरांतून आलेल्या विद्याथ वर्गापुरती ही भूमिका मर्यादित राहू शकत नाही तर आपल्या भोवतालातील बरे-वाईट, आंतरिक पातळीवर अस्वस्थ निर्माण करणारे घटनाप्रसंग, व्यक्ती यांच्याकडेही एक संवेदनशील आणि विचारी समाजघटक म्हणून शिक्षक पाहत असतो. याची प्रचीती सेवानिवृत्त प्राचार्य शिवाजी साळुंके यांच्या सदर कथासंग्रहातून प्रभावीपणे येते. हा शिक्षक-लेखक कधी व्यक्तीच्या जीवनकहाणीपासून कथेला सुरुवात करतो, कधी हुंडाबळी, बलात्कार अशा तात्कालिक घटनांमधून कथानकाला चालना मिळते, कधी गावखेड्यातील उलथापालथी प्रसंगचित्रण व वातावरणनिर्मिती यांना आपसूक वाट मोकळी करून देतात, कधी जातपात, आंतरजातीय विवाह यांना चर्चेच्या केंद्रस्थानी आणून सामाजिक वास्तवाच्या भयावह रूपाचे दर्शन घडवले जाते तर कधी मुक्त चिंतनाव्दारा ललित गद्याचा भावप्रत्यय देतात. वर्गातील शिक्षकाकडून समाजशिक्षकाच्या व्यापक भूमिकेकडे झुकणारा या कथालेखकाचा पिंड आपले लक्ष वेधून घेणारा आहे. म्हणून तर सदर पुस्तकाचे शीर्षक ‘कथा जनाच्या व्यथा मनाच्या’ हे आहे. आपला जीवनानुभव त्याच्या अस्सल प्रत्ययासह आणि आंतरिक आचेसह अभिव्यक्त करणाऱ्या या लेखकाच्या सदर पुस्तकाचे हार्दिक स्वागत आहे.
- आशुतोष पाटील